तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह सामाजिक उत्तरदायित्व जपावे : – प्रमोद पिपरे * संताजी सोशल मंडळ, गडचिरोलीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

AVB NEWS गडचिरोली, :- “गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम आहे. शिक्षणासोबतच चारित्र्य, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने एकजुटीने कार्य केले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी केले
संताजी सोशल मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने इयता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८०टक्के व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के (त्यापेक्षा अधिक)गुण मिळविणाऱ्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या (ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळालेले विद्यार्थी) यांचा सत्कार समारंभ संताजी भवन येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रमोदजी तरारे अध्यक्ष, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपीठ, मुंबई तथा माजी धर्मदाय आयुक्त (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. देवानंद कामडी, अध्यक्ष, संताजी सोशल मंडळ, गडचिरोली होते. प्रमुख अतिथी म्हणून,मा. प्रभाकर वासेकर अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली,इंजि. प्रमोद पिपरे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे, ॲड. प्रनोती निंबोरकर, नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोली, सौ.योगिता पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) नप गडचिरोली मा. विठ्ठल कोठारे, सचिव, संताजी सोशल मंडळ, गडचिरोली, मा. ॲड. रामदास कुनघाडकर, उपाध्यक्ष, संताजी सोशल मंडळ,गडचिरोली, श्री.अरुण निंबाळकर, श्री.सुरेश भांडेकर,नागपूरचे प्रतिष्ठित व्यापारी श्री.बालाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री.संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..
कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रायोजकांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दारिद्र्य रेषेखालील ५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची स्कॉलरशिप,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास समाजबांधव, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभाताई खोब्रागडे, श्री.सुरेश निंबोरकर यांनी मानले तर आभार शिक्षक श्री. राजेंद्र भुरसे यांनी मानले.