टेंभा ते चांभार्डा बायपास रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करा * अरविंद कात्रटवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

AVB NEWS गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील टेंभा ते चांभार्डा या बायपास रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार व पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाच्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव ते अमिर्झा सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराने रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य मरेगाव येथून न नेता टेभा ते चांभार्डा या रस्त्यावरून वाहतूक केली. कंत्राटदारांच्या अवजड वाहनांमुळे टेंभा ते चांभार्डा या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ता पुर्णपणे खड्यात गेला असून नागरिकांना मार्गक्रमण करणे धोकादायक झाले आहे. रस्त्याची दैनावस्था लक्षात घेतली तर या रस्त्यावरून दुचाकीवाहन सुध्दा चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्यावर वाहने फसत असून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेला सबंधीत कंत्राटदार व पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाचे अभियंता जबाबदार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळण करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शासन रस्ते विकासांवर कोटयावधी रूपये खर्च करीत आहेत. दुर्गम भागातील रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेतली तर साधी दुचाकी वाहन सुध्दा गावात जाऊ शकत नाही. काही गावांमध्ये तर रूग्णवाहिका पोहचू शकत नसल्याने रूग्णांना खाटेवर मांडून रूग्णालयात उपचारासाठी नेले जात असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. एवढेच नव्हे तर रस्त्यांची समस्या आणि खराब रस्त्यांमुळे वाढलेले अपघाताचे प्रमाण याची मा.सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा गंभिर दखल घेतली आहे. कंत्राटदार एका रस्ता दुस्तीसाठी बांधकाम साहित्य वाहतूकीमुळे दुसऱ्या रस्त्याची खराबी करून शासनाचे नुकसान करीत असेल तर ही गंभिर बाब आहे. मरेगाव ते अमिर्झा रस्ता दुरूस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने बांधकाम साहित्य वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब न करता टेंभा ते चांभार्डा या रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. मार्ग असतांना सुध्दा त्या मार्गाचा वापर केला नाही.
टेंभा ते चांभार्डा या रस्त्याच्या दुरावस्थेला सबंधीत कंत्राटदार आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाचे सबंधीत अभियंता सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक व शेतकरी बांधवांना मार्गक्रमण करण्याबरोबरच शेतावर कृषी साहित्य वाहून नेण्यास अडचन निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने सदर गंभिर बाबीची दखल घेउुन रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेला कंत्राटदार आणि सबंधीत अभियंत्यावर शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि टेंभा ते चांभार्डा या बायपास रस्त्याच्या झालेल्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी दिला आहे