जिल्हा

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान ‘दिशा’ समितीची आढावा बैठक ; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

AVB NEWS गडचिरोली : –जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.

विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा
बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने:
* *प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :* ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे आणि प्रलंबित कामांबाबत त्यांनी माहिती घेतली.
*आरोग्य आणि शिक्षण: राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी भर दिला. पोषण आहार वाटप करताना अनेकदा धान्य अगोदर खरेदी केल्या जाते आणि बऱ्याच उशिरा त्याचे वाटप केला जाते यामुळे त्या धान्याची गुणवत्ता खराब असल्याचे नमूद करत यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले
स्वच्छ भारत मिशन व गृहनिर्माण: स्वच्छ भारत मिशन (शहरी) योजनेअंतर्गत नगरपरिषदेद्वारे घंटागाडीने घरोघरी कचरा उचलण्याची सुविधा उपलब्ध आहे तरीदेखील काही ठिकाणी कचरा जमा होत असल्याबाबत त्यांनी नगरपरिषदेला घंटागाडी द्वारे घरूनच कचरा जमा व्हावा याची खबरदारी घेण्याची सांगितले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलासाठीच्या थकित हप्त्याची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती सवर्गातील नागरिकांच्या घराच्या हप्ते प्राप्त झाले आहे मात्र इतर मागासवर्ग संवर्गातील घरकुलाची हप्ते शासनाकडून वितरित झाल्यावरही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित असल्याचे लक्षात आणून देत रकमा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार आणि कौशल्य विकास: दीन दयाल अंत्योदय योजना आणि दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्वावलंबी करण्याचे आवाहन केले.

रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरही बैठकीत चर्चा झाली. विशेषतः आष्टी ते आलापल्ली या ४५ कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी आष्टी ते लगाम या १७ कि.मी.चे काम पूर्ण झाले असून, लगाम ते आलापल्ली दरम्यानच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आलापल्ली ते सिरोंचा या रस्त्याचे कामातील दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त करत कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागात खडीकरण्याचे रस्ते बांधकामांसाठी प्रमाणित निकष (मानके) ठरवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार रामदास मसराम यांनी स्थानिक मतदार संघातील अडचणी मांडून त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधी मार्फत मांडण्यात येणाऱ्या तक्रारींची तातडीने दाखल घेण्याच्या सूचना यावेळी खासदार किरसान यांनी दिल्या.
बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.