बापजाद्याने कमावलेली ‘ आयुष्यभराची भाकरी’ द्यायला कोण धजावेल ? * विकासाचे प्रकल्प राबवितांना वनकायदा शिथील करून झुडपी जंगल उपयोगात आणणे हाच एकमेव पर्याय * नवख्या कंपन्यांकडून जमिनी खरेदीचा प्रयत्न होत असल्याने याविरोधात आता स्थानिकांचा रोष
अनिल बोदलकर / एव्हीबी न्यूज गडचिरोली :- .राज्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल आणि अविकसीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हयाची सुरजागड लोहप्रकल्पामुळे औद्योगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ही बाब जिल्हयाच्या विकासाला नवी दिशा देणारी आहे. अशातच जिल्हयातील चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यात नवीन उद्योग आणि विमानतळ उभारणीसाठी हालचाली सुरू आहेत. जिल्हयात उद्योग उभारणी व विकास प्रकल्पांसाठी मोठया प्रमाणात जमिन लागणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या सुपिक जमीनी भूसंपादीत करण्यात प्रयत्न सुरू आहे. याला शेतकरी आणि विविध क्षेत्रातील सुज्ञ नागरिकांकडून विरोध दर्शविल्या जात आहे. बापजाद्याने कमावलेली ‘आयुष्यभराची भाकरी’ मागून आणि शेतकर्यांना भूमहिन करून जिल्हयाचा विकास साधणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हयाचा औद्योगीक विकास करायचा असेल तर वनकायद्या शिथील करून झुडपी जंगल उपयोगात आणणे हा पर्याय असून याकडे शासन व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तर मग शेकडो कोटीचे चिचडोह व कोटगल बॅरेज कोणत्या कामाचे ?
जिल्हयात बारमाही वाहणाऱ्या नद्या असून सिंचनाची समस्या असल्याने शासनाने चामोर्शी व गडचिरोली तालुक्यात शेकडो कोटीचे चिचडोह व कोटगल बॅरेज प्रकल्प उभारले आहे. या प्रकल्पाचा उपयोग शेतकर्यांना बारमाही सिंचनाची सोय म्हणून होणार आहे. असे असतांना याच प्रकल्पांतर्गत येणार्या सुपीक जमिनी विकास प्रकल्पासाठी भुसंपादीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेजमिनीच राहिल्या नाही तर मग चिचडोह व कोटगल बॅरेज सिंचन प्रकल्पाचा उपयोग काय? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
प्रकल्प निर्मितीच्या नावाखाली नवख्या कंपन्यांकडून जमीन खरेदीचा घाट !
पोलाद प्रकल्प निर्मितीच्या काही नवख्या कंपन्यांकडून जमिनी खरेदीचा प्रयत्न होत असल्याने याविरोधात आता स्थानिकांचा रोष उफाळून येत आहे.चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली येथे एका कंपनीकडून प्रस्तावीत पोलाद प्रकल्पाला गावकर्यांनी कडाडून विरोध केला असून सरपंचानी गावकऱ्याना विश्वासात न घेता बोलावलेली विशेश सभा उधळून लावण्यात आली. सुरजागड पहाडीवर लोहखनिज उत्खनन सुरू झाल्यापासून जिल्हयात विविध कंपन्यांकडून प्रकल्प निर्मितीच्या हालचाली सुरू आहेत. मात्र काही नवीन कंपन्यांकडून जमिनी खरेदीचा प्रयत्न होत असल्याने याविरोधात आता स्थानिक नागरिकांचा रोश उफाळून येत आहे. गडचिरोली जिल्हयात पोलाद प्रकल्पाचा दावा करणार्या अनेक कंपन्यांना पेव फुटले आहे. विशेश म्हणजे काही नवीन कंपन्या जिल्हयात जमिनी खरेदी करण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत.
तुमच्या संमतीशिवाय जमिनीचा एक इंच तुकडाही जाऊ देणार नाही :- आ.डॉ. नरोटे यांची ग्वाही
एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की, तुमची जमीन ही तुमची मालमत्ता आहे आणि त्यावर निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार फक्त तुमचाच आहे. पिढ्यानपिढ्या तुम्ही ज्या जमिनीची मशागत केली, ज्यावर तुमची मुलं शिकून मोठी झाली, ती जमीन तुमच्या संमतीशिवाय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.जोपर्यंत तुम्ही संमती देत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीचा एक इंच तुकडाही जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे.जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींसोबत होणाऱ्या प्रत्येक चर्चेत तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. अशी ग्वाही आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी दिली. आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी भेंडाळा येथे आयोजित शेतकरी परिषदेत उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी आणि भगिनींशी संवाद साधला.
ण्