अरविंद कात्रटवार यांनी अभियंता साखरवाडेच्या प्रकरणाबाबत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घेतली भेट * तातडीने फौजदारी कारवाई करून गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्याची केली मागणी

AVB NEWS गडचिरोली:- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी याबाबत लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार जिल्हयाचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची नुकतीच भेट घेऊन लक्ष वेधले. अरविंद कात्रटवार यांनी ना. जयस्वाल यांच्यासमोर अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. एक अधिकारी तब्बल ८ वर्षापासून एकाच विभागात ठाण मांडून कसा का बसू शकतो ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अरविंद कात्रटवार यांनी जिल्हयाचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या लक्षात आणून दिले की कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे परंतू अद्यापही झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही.
कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. 2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या ऑफलाईन निविदा नियबाहय रित्या काढण्यात आल्या असून सदर कामे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला.
कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही. साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी (लज्जास्पद) शब्दात बोलतात. शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे.
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे हे शासकीय नियम धाब्यावर बसवून हूकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत. जनतेचा शासन व प्रशासनाप्रती विश्वास कायम ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून तात्काळ हक्कालपटी करण्यात यावी अशी मागणी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी जिल्हयाचे सहपालकमंत्री आशिष जायस्वाल यांच्याकडे केली.